#htmlcaption1

सप्तमातृका पूजन


गुरुवार, दि. २४ ऒक्टोबर २०१३ रोजी परमपूज्य बापूंनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर प्रवचन केले. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या बाळाचं जीवन निरोगी असावं आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं. ह्या दृष्टीकोनातून पूर्वापार परंपरेनुसार घरात बाळ जन्माला आल्यानंतर षष्ठी पूजन केलं जातं. मात्र काळाच्या ओघात चुकीच्या रूढी जोपासल्या गेल्या कारणाने ह्या पूजनाचे महत्त्व फक्त कर्मकांडापुरते मर्यादित राहिले. ह्या पूजनाचा उद्देश, त्याचे महत्व आणि मूळ पूजनपद्धती ह्याबद्दल परमपूज्य बापूंनी प्रवचनातून मार्गदर्शन केले.

परमपूज्य बापू म्हणाले, “ब्रह्मर्षींमध्ये पहिल्यांदा आई झालेल्या लोपामुद्रा (अगस्त्य ऋषींची पत्नी) आणि अरुंधती (वसिष्ठ ऋषींची पत्नी) हया एकाच वेळेस प्रसूत झाल्या. अगस्त्य-लोपामुद्रा व वसिष्ठ-अरुंधती, ह्या चौघांनी आपापल्या बाळांचे जे पहिलं पूजन केले त्याला ’सप्तषष्ठी पूजन’ म्हणून संबोधण्यात आले.

मातृवात्सल्यविंदानम् मध्ये आपण वाचतो की शुंभ-निशुंभ ह्या राक्षसांशी लढण्याची वेळ आल्यावर महासरस्वतीच्या मदतीसाठी सगळे देव आपापल्या शक्ती पाठवतात. त्या सात शक्ती म्हणजेच सप्तमातृका व त्यांची सेनापती आहे काली. त्या सात मातृकांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
१) माहेश्वरी – जी पंचमुखी आहे आणि वृषभावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात त्रिशूळ आहे.
२) वैष्णवी – जी गरुडावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात चक्र, गदा आणि पद्म आहे.
३) ब्रह्माणी – जी चार मुख असलेली आहे आणि हंसावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात कमंडलू व अक्षमाला आहे.
४) ऐन्द्री – जी इंद्राची शक्ती आहे आणि ऐरावतावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात वज्र आहे.
५) कौमारी – जी सहा मुख असलेली आहे आणि मोरावर आरूढ झालेली आहे.
६) नारसिंही – जिचे मुख सिंहीणीचे आहे. तिच्या हातात गदा व खडग् आहे.
७) वाराही – जिचे मुख वराहाचे आहे व जी पांढऱ्या रंगाच्या रेड्यावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात चक्र, खडग्, तलवार व ढाल आहे.”

0 comments: